Tuesday, August 17, 2010

आमीर लाईव्ह...

"पीपली लाईव्ह' हा आमीर खानची निर्मिती असलेला चौथा चित्रपट. मनोरंजनाबरोबरच काहीतरी "सोशल मेसेज' देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमीरच्या या चित्रपटातही त्या पद्धतीचा वेगळेपणा आहे. पत्रकारिता करणाऱ्या अनुषा रिझवीचा हा पहिलाच चित्रपट. त्यानिमित्तानं आमीरशी साधलेला हा संवाद.



"पीपली लाईव्ह'चा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी काही संबंध आहे का?

- अजिबात नाही. गेल्या वर्षभरापासून मी या चित्रपटाचा शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी कसलाही संबंध नसल्याचं सांगत आलोय; परंतु त्यावर आपल्याकडचा "मीडिया' थोडाही विश्‍वास ठेवायला तयार नव्हता; परंतु या चित्रपटाच्या "प्रोमोज'चे प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर या चित्रपटाच्या कथानकाबाबतचे गैरसमज दूर झाले आहेत. हा चित्रपट म्हणजे आपल्या समाजावरचं प्रहसन आहे. ग्रामीण भारत आणि शहरी भारतामधील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. या चित्रपटात त्यावर खुसखुशीत भाष्य करण्यात आलंय.



"जाने भी दो यारो' तसेच श्‍याम बेनेगलांच्या "वेलकम टू सज्जनपूर' आणि "वेल डन अब्बा'सारखा या चित्रपटाचा फॉर्म आहे का?

- श्‍यामबाबूंचे हे दोन्ही चित्रपट मी अजूनपर्यंत पाहिलेले नाहीत. त्यामुळे त्याबद्दल मला भाष्य करता येणार नाही. मात्र "जाने भी दो यारो'शी या चित्रपटाचा संबंध आहे, हे मी सांगू शकतो. "जाने भी..'मध्ये भ्रष्टाचारावर प्रहसन करण्यात आलं होतं; मात्र हा चित्रपट फार्सिकल अंगानं जाणारा होता. आमचा चित्रपट फार्सिकल नसून वास्तव विनोदावर तो आधारला आहे.



अनुषाचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपट माध्यमाशी ती निगडित नसतानाही तू तिला थेट हा चित्रपट दिग्दर्शनासाठी कसा काय दिलास? अशा लहान "बजेट'च्या चित्रपटाची निर्मिती कराविशी तुला का वाटली?

- माझ्या दृष्टीनं कथानक हा चित्रपटाचा प्राण असतो. कथानक जर मला आवडलं तर मग इतर गोष्टी माझ्यासाठी सोप्या होतात. त्या वेळी मला मग माझ्या चित्रपटाचा कॅनव्हास लहान आहे की मोठा? असा प्रश्‍न पडत नाही. कथानक आवडलं तर मी थेट त्यात काम तरी करतो किंवा त्याची निर्मिती तरी करतो. "लगान'ची मी निर्मिती केली तेव्हा त्याची "कमर्शियल व्हॅल्यू' मी तपासली नव्हती. नेमकी तीच गोष्ट माझी निर्मिती असलेल्या "तारे जमीं पर'लाही लागू आहे. "रंग दे बसंती' जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा भगतसिंहांवर तब्बल चार चित्रपटांची निर्मिती झाली होती. त्यामुळे या चित्रपटाचा "कमर्शियल अँगल' कुठेही उद्‌भवतच नव्हता. तरीदेखील या चित्रपटाचं कथानक आवडल्यानं मी तो केला आणि त्याचा पुढचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. मी माझ्या "इन्स्टिंक्‍ट'वर निर्णय घेतो. आता अनुषाच्या नवखेपणाबद्दलच म्हणत असशील, तर तो माझ्यासाठी फारसा मोठा "इश्‍यू' नव्हता. कारण यापूर्वीही मी अनेक नवोदितांबरोबर काम केलं असून त्यांच्यासोबतचा माझा अनुभव खूप चांगला आहे. अनुषानं ऐकवलेलं कथानक मला खूप आवडलं. यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्यासाठीही नवीन होत्या. "बीडीओ' हा काय प्रकार असतो हे मला माहीत नव्हतं. पटकथा वाचल्यानंतर मला "बीडीओ' म्हणजे "ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर' असतो हे समजलं. त्यानंतर तिनं मला काही "टेस्ट शॉट्‌स' दाखवले. तेसुद्धा चांगले उतरले होते. ते पाहिल्यानंतर माझा तिच्याबद्दलचा विश्‍वास वाढला. आता चित्रपट पाहिल्यानंतर मी दाखविलेला विश्‍वास तिनं खरा केला, याचा मला आनंद आहे.



"पीपली लाईव्ह'मध्ये अभिनेता रघुवीर यादवचा अपवाद वगळता इतर सर्व कलाकार नवीन आहेत. असं करणं तुला "रिस्की' वाटलं नाही का?

- कथानकाची जी गरज आहे, ती पुरी करणारे चेहरे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. या चित्रपटातील कलावंतांची निवड अनुषा आणि या चित्रपटाचा सहदिग्दर्शक मेहमूदनं केली आहे. या दोघांनीही शक्‍यतो खरे चेहरे निवडले आहेत. यातल्या बहुतेक सगळ्या चेहऱ्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. हबीब तन्वीर यांचा एक "थिएटर ग्रुप' आहे. त्यातील काही कलावंतांची निवड करण्यात आलीय. या सर्व चेहऱ्यांना रंगभूमीचा अनुभव असला तरी चित्रपट माध्यमासाठी त्यांनी पहिल्यांदाच काम केलंय. मी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यातील सर्व कलावंतांचा अभिनय पाहून मी थक्क झालो. कारण, या क्षेत्रात येऊन मला वीसहून अधिक वर्षं झालीत. मात्र अजूनदेखील मला असा "परफॉर्मन्स' देता आलेला नाही.



चित्रपटसृष्टीतील कलावंतांची तू चांगलीच थट्टा करतोस. मात्र या चित्रपटात तुझीच थट्टा करण्यात आलीय. याबद्दल काय सांगशील?

- खरंय हे. या चित्रपटातला विनोद वेगळ्या पद्धतीचा आहे. अनुषानं अनेक गोष्टींची खिल्ली उडवलीय. तिला माझीही खिल्ली उडवायची होती. या चित्रपटात "मीडिया'ला खूप महत्त्वाचं स्थान आहे. हा "मीडिया' आमच्या चित्रपटाचं "रिपोर्टिंग' करतोय, ही कल्पना होती. या "रिपोर्टिंग'मधून चित्रपटातल्या प्रमुख पात्रांची ओळख आम्ही दाखवलीय आणि त्याचे तसे "प्रोमोज'ही विविध वाहिन्या तसेच चित्रपटगृहांमधून सुरू आहेत. या चित्रपटाचं भोपाळजवळ शूटिंग सुरू होतं तेव्हा खरोखरीच एक जत्रा भरली होती. बरीच गर्दी असल्यानं तिथं वेगवेगळ्या वस्तू विकणारे विक्रेतेही आले. त्यातच माझ्या "गजनी' चित्रपटाचा फोटो असलेले वेफर्सही विकायला आले होते. हे वेफर्स काही आमच्या "प्रॉडक्‍शन'कडून उपलब्ध झालेले नव्हते. या वेफर्सवर एका वाहिनीचा प्रतिनिधी भाष्य करतो. "ये पागल हो गया है । भय्या बार बार "लगान' नहीं बनती' असा एक संवाद आहे. अशा पद्धतीनं अनुषानं माझी खिल्ली उडवलीय. तिला हा प्रसंग चित्रपटात हवा होता. मात्र त्यासाठी योग्य जागा न मिळाल्यामुळे आम्ही तो फक्त "प्रोमोज'मध्येच ठेवलाय.



तुझी निर्मिती असलेल्या चित्रपटांना विदेशातूनही मोठी मागणी असते. त्यामुळे "पीपली लाईव्ह'च्या विदेशातील प्रदर्शनासाठी काही खास तयारी केली आहेस का?

- "पीपली लाईव्ह'चे विदेशी हक्क विकताना आम्ही खूप काळजी घेतली. तिथल्या वितरणाचा अभ्यास करताना मला आढळलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडचं वितरण तंत्र हे अधिक चांगलं आहे. म्हणूनच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह मध्य पूर्व देशांमध्ये हा चित्रपट आम्ही स्वतःच वितरित करतो आहे. अमेरिकेत सर्वसाधारणपणे चांगला हिंदी चित्रपट 10 लाख डॉलर्सचा व्यवसाय करतो. आमच्या "थ्री इडियट्‌स'नं 70 लाख डॉलर्सचा व्यवसाय केला होता.



नवीन चित्रपट कधी स्वीकारणार आहेस?

- सध्या तरी फक्त "पीपली लाईव्ह'. त्याच्यातून बाहेर पडलो की मग "धोबी घाट' आणि नंतर "देल्ली बेली'. या तीन चित्रपटांचं प्रदर्शन मार्गी लागलं की मग मी अभिनय करायला मोकळा होणार आहे.



1 जुलैला तू ट्‌विटरवर आला आहेस. चाहत्यांचा तुला कसा रिस्पॉन्स मिळत आहे.

- मी ट्‌विटरवर आलो नाही, मला जबरदस्तीनं आणलं गेलं. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी थोडा मागं आहे. मात्र बच्चनसाहेबांनी मला ट्‌विटरवर येण्याचा आग्रह केला आणि माझ्याकडून 1 जुलै ही तारीखही वदवून घेतली. अर्थात, चाहत्यांचा प्रतिसाद जबरदस्त आहे.

अमिताभ बच्चन हेच माझे गुरू - रजनिकांत

मुंबई - खरं तर दाक्षिणात्य चित्रपटरसिकांच्या मनातला तो देव, पण चित्रपट क्षेत्रात तो बिग बी अमिताभ बच्चन यांना आपला गुरू मानतो. नव्हे, तर अमिताभ त्याचे प्रेरणास्थान.




दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीवर राज्य करणारा रजनिकांत अमिताभ यांच्याविषयी भरभरून बोलतो, तेव्हा तो माणूस म्हणूनही किती मोठा आहे, याचा प्रत्यय येतो. रजनिकांतच्या बिगबजेट रोबो या चित्रपटाचे संगीत रविवारी रात्री लॉंच झाले. त्यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील या दोन्ही दिग्गजांना रंगमंचावर एकत्र पाहण्याची संधी रसिकांना मिळाली. रजनिकांतने तब्बल तीन वर्षांनंतर मुंबईत पाऊल ठेवले.



नव्वदच्या दशकांत झळकलेल्या हम या चित्रपटात अमिताभ आणि रजनिकांतची जोडी रसिकांनी एंजॉय केली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तो आपल्या शिवाजी द बॉस या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी मुंबईत आला होता.



रोबो संगीत लॉंचच्या निमित्ताने अमिताभ यांना भेटून आनंदीत झालेला रजनिकांत त्यांच्याविषयी भरभरून बोलला. तो म्हणाला, अमिताभ हे माझे प्रेरणास्थान आहेत. तसेच, ते माझे रोल मॉडेल आणि गुरूही आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा मी नेहमीच आदर करतो. अंधा कानून, गिरप्तार आणि हम या चित्रपटांमधून आम्ही दोघांनी एकत्रित काम केले. त्यावेळी त्यांनी मला जे प्रेम दिले. माझी जी काळजी घेतली, ती मी कधीही विसरणार नाही.



रजनिकांत यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमिताभ यांनी रजनिकांत इथल्या मातीचे सच्चे सुपूत्र असल्याची भावना व्यक्त केली. मी रजनिकांतबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे एक मित्र म्हणून आणि एक सहकारी म्हणून मला त्याचे महत्त्व वाटते. तो या मातीचा सच्चा सुपूत्र आहे, ज्यावर सर्व भारतवासी प्रेम करतात.



त्याची नम्रता आणि माणुसकीबद्दल मला कौतुक वाटते. त्याला मिळालेले प्रसिद्धी, मोठेपणाचा त्याने जमिनीवर राहूनच आनंद लुटला. त्याच्यातील नम्रता प्रत्येक भारतीयाने उदाहरण म्हणून डोळ्यासमोर ठेवण्याजोगी आहे. त्याच्या साधेपणाचा, प्रामाणिकपणाचा माझ्यावर विशेष प्रभाव आहे, असेही अमिताभ म्हणाले.



हॉलिवूडच्या धर्तीवर रोबो हा चित्रपट अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेला चित्रपट आहे. जेव्हा एखादा रोबेट माणसाच्या शरीरात शिरकाव करतो, तेव्हा काय काय होते, याचे चित्रण या चित्रपटात केले आहे.

नोकरी कशी शोधायची?

सोशल मीडियाचा वापर नोकरीच्या संधी शोधण्यासाठी आणि नोकरी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अगदी जाता जाता बनवलेले "फेसबुक'वरचे तुमचे प्रोफाईलही कदाचित तुमची नोकरीची संधी ठरवू शकते. त्यामुळे नोकरीचा शोध घेताना अशा साइटस्‌वरील आपली प्रोफाईल्सही "अप टू डेट' ठेवली पाहिजेत. कोणत्या सोशल नेटवर्कचा कसा वापर करायचा नोकरीसाठी...?




"कॉलेज संपले, आता

नोकरी शोधली पाहिजे...''

"मला माझ्या नोकरीत

आता बदल हवाय...''

"मी या नोकरीला वैतागलोय.

नोकरी बदलायची आहे...''



नोकरी शोधण्याची एक नाही तर अशी अनेक कारणे. नोकरी आणि तीही योग्य नोकरी शोधणे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. जागा 5 आणि अर्ज 500 ही सध्याची परिस्थिती. "एम्प्लॉयमेंट मार्केट' दिवसागणिक आणखीच अवघड होत जाणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला तुमच्या अंगातील सर्व कला या सर्वांच्या आधी जॉब शोधण्यासाठी वापराव्या लागणार आहेत. नवीन जागा भरायची आहे तर त्या जागेसाठीचा सर्वांत पहिला अर्ज माझा असला पाहिजे आणि आपण कसे या पदासाठी योग्य आहोत, हे संस्थेला सर्वांच्या आधी पटवून देता आले पाहिजे. ही गरज सुरू होतेय आणि इथेच सोशल मीडिया आपल्या मदतीला धावून येतो आहे.



या आहेत काही सोशल मीडिया टिप्स, ज्या तुम्हाला तुमचा नवीन आणि "ड्रीम' जॉब देऊ शकतात :



'लिंक्‍डइन' : "लिंक्‍डईन' ही वेबसाईटच मुळी आहे प्रोफेशनल नेटवर्किंगसाठी. "लिंक्‍डइन'मध्ये आपण आपला प्रोफाईल बनवून त्यामध्ये आपल्या व्यवसायासंबंधीची माहिती देऊ शकता. नीट बनवला तर हा प्रोफाईल तुमचा ऑनलाईन बायोडेटाच बनून जातो. पण बरेच जण "लिंक्‍डइन'चा वापर पूर्णपणे करीत नाहीत. "लिंक्‍डइन'मध्ये आपला प्रोफाईल 100 टक्के पूर्ण आहे याची खात्री करा आणि किमान एक तरी "रेक्‍मेंडेशन' आपल्या नावे असू द्या. आपल्या सध्याच्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी "लिंक्‍डइन'वर कनेक्‍टेड राहा.



"लिंक्‍डइन'मध्ये "जॉब' असा एक विभाग आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या स्किलसेट्‌सना योग्य होईल, अशी नोकरी शोधू शकता. जरी योग्य नोकरी नाही मिळाली तरी योग्य माणसे जरूर मिळतील, जी तुम्हाला नोकरी शोधण्यात मदत करू शकतील. अशी माणसे ओळखा आणि त्यांच्याशी जरूर कनेक्‍ट व्हा. उदा. एखाद्या संस्थेचा रिक्रूटमेंट हेड अथवा ह्युमन रिसोर्स विभागामधील मंडळी.



ट्‌विटर : ट्‌विटरचा उपयोग फक्त काही तरी वाद घालायला किंवा मी सध्या काय करतोय हे सांगण्यापुरता नाही, तर ट्‌विटर वापरून तुम्ही तुमची नवीन नोकरी शोधू शकता. ट्‌विटरवर अनेक लोकांना फॉलो करण्याआधी आपला स्वतःचा प्रोफाईल नीट अपडेट करा. एक योग्य फोटो (अवतार) निवडा आणि मगच लोकांना फॉलो करणे चालू करा. फक्त आपल्याबद्दलच नव्हे, तर आपल्या कार्यक्षेत्राबद्दलही ट्‌विट करत चला. ट्‌विटरमध्ये फक्त जॉब नाही, तर व्यक्तींना शोधा. आजकाल अनेक संस्था आणि रिक्रूटमेंट एजन्सीज ट्‌विटरवर आहेत. ते नवीन जॉब ट्‌विटरवर अपडेट करीत असतात. त्यामुळे हा जॉब ट्‌विट केल्या क्षणीच आपल्याला समजू शकतो. उदा. KPITCummins (@kpitcareers), ADP (@adpcareers).



फेसबुक : फेसबुकचा तसा थेट नोकरी मिळवण्यात वापर कमी आहे; पण फेसबुकमध्ये तुम्ही अनेक लोकांशी अगदी कमी वेळात संपर्क साधू शकता आणि संवाद साधू शकता. त्यामुळे "लिंक्‍डइन' आणि ट्‌विटरमार्फत ज्या व्यक्ती तुम्ही शोधल्या आहेत त्यांच्याशी परिचय वाढवण्यासाठी तुम्ही फेसबुकमध्ये त्यांचे मित्र बनू शकता आणि हो, आपला फेसबुक प्रोफाईल अतिशय व्यवस्थितपणे बनवा. तुमच्या आवडी-निवडी, छंद, आवडते खाद्यपदार्थ, पुस्तके, लेखक इत्यादी वैयक्तिक स्वरूपाची माहिती, ज्यामुळे व्यक्तिमत्त्व समजते. अनेक रिक्रूटर्स एखाद्याला नोकरीवर घेण्यापूर्वी त्याचा फेसबुक प्रोफाईल नक्की पाहतात. असे होऊ देऊ नका, की तुम्ही मुलाखतीमध्ये माझा वाचन हा छंद आहे असे सांगाल आणि फेसबुक प्रोफाईलमध्ये वाचन बिलकूल आवडत नाही, असं लिहिलंय. तुम्हाला त्वरित खोटारडा ठरवून बाद केले जाईल. त्यामुळे फेसबुक प्रोफाईलकडेही व्यवस्थित लक्ष असू द्या.



यू ट्यूब : सचिन तेंडुलकरची वन-डेमधील डबल सेंच्युरी पुन्हा पाहायची आहे? पाहिजे तेव्हा पाहता येईल. यू ट्यूबवर अनेक चाहत्यांनी तो व्हिडिओ अपलोड केला आहे ना. पाहिजे तेव्हा सचिनची सेंच्युरी पाहा. तसेच पाहिजे तेव्हा रिक्रूटर्सना आपली माहिती काही क्षणांत मिळवता आली आणि तीही आपल्याच मुखातून तर...? दर वेळी प्रत्यक्ष भेट होईलच असे नाही. यासाठी आपला "व्हिडिओ रेझ्युमी' बनवून तो यू ट्यूबवर अपलोड करून ठेवा. सध्या "व्हिडिओ रेझ्युमी'चा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, अगदी फारच कमी लोकांचा स्वत:चा "व्हिडिओ रेझ्युमी' आहे. अनेकांच्यातून वेगळे असे काही आपले असलेले केव्हाही चांगलेच ना. एक चांगला "व्हिडिओ रेझ्युमी' हा छोटा, आपल्याबद्दल माहिती देणारा, आपण संस्थेस कसा फायदा पोचवून देऊ शकू हे सांगणारा असावा.



वरील सोशल मीडियासोबतच आपण गूगल ऍलर्टस्‌, फ्रीलान्सिंग, ट्‌विटर सर्च, स्वतःचा ब्लॉग इत्यादी वापरूनही जॉब शोधू शकता. हे सर्व पर्याय जर एकत्रितपणे व्यवस्थित नियोजन करून वापरले तर फक्त आपल्या नजीकच्याच नव्हे, तर संपूर्ण जगातील रोजगारसंधी आपणास उपलब्ध होतील; गरज आहे ती फक्त "सोशल' होण्याची.

वॅका, वॅका नव्हे, आता "यारो, इंडिया बुला लिया'

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीवरून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या गदारोळात सोमवारी एक उल्हसित करणारी बातमी समोर आली. या बातमीने सहाजिकच सर्वांच्या चेहेऱ्यावर हास्याची लकेर उमटून गेली. ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या या खेळाच्या महामेळ्याचे गीत ऑस्करविजेते भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या संगीतातून गुंजणार असून, फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण झालेली "वॅका वॅका'ची "क्रेझ' या गीताने पुसली जाईल, असा विश्‍वास खुद्द संगीतकार रेहमान यांनी व्यक्त केला.




रेहमान यांच्याच हस्ते स्पर्धेच्या गीताचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी रेहमान म्हणाले, ""आता वॅका, वॅका नाही. आपल्याला त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन आकर्षक गीत सादर करायचे आहे. कसे, ते समजावून सांगण्यास कठीण आहे. पण जेव्हा ते तुम्ही ऐकाल तेव्हा हे गीत "वॅका, वॅका'पेक्षा वेगळे असल्याची तुमची खात्री पटेल.''



रेहमान यांनी या गाण्याविषयी काही माहिती दिली, पण गाणे कोणते असेल याबाबत त्यांनी गुप्तता बाळगली. केवळ गाण्याच्या सुरवातीचे शब्द त्यांनी ऐकविले. ते म्हणाले, ""भारतीय सांस्कृतिक वारसा आणि महात्मा गांधी यांना अभिवादन करणारा "ऑर्केस्ट्रा' करण्याचे नियोजन आहे. गाण्यासाठी भारतीय आणि परदेशी वाद्यांचे "फ्यूजन' उपयोगात करण्यात येईल. गाणे हिंदीतूनच असेल, पण यात दहा टक्के इंग्रजी शब्द असतील आणि गाणे असेल "यारो, इंडिया बुला लिया.'''



या गाण्याचे आज प्रकाशन करण्यात आले असले, तरी ते प्रदर्शित होण्यास अजून दहा दिवस तरी जाणार आहेत. रेहमान म्हणाले, ""गेले सहा महिने या गाण्यावर काम करत आहे. गाणे माझ्याच आवाजात असून, बरोबरीने कोरस असेल. माझी खात्री आहे की आम्ही केलेला प्रयोग यापूर्वी भारतात कधीच झाला नसेल. गाण्याच्या तयारीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम चालू असून, अजून दहा दिवसांत ते पूर्ण तयार होईल. उद्‌घाटन सोहळ्यात या गाण्याची निश्‍चित "धूम' असेल आणि सर्व उपस्थित प्रेक्षकांना माझ्यासोबत मी गाण्याचे आवाहन करेन. खरेच हा अनुभव खूप जबरदस्त असेल.''



यालाही मंत्रिगटाचीच मान्यता

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे संयोजन समितीला निर्णय घेण्याचे कुठलेच अधिकार नाहीत. इथून पुढे मंत्रिगटाने "ग्रीन सिग्नल' दिल्यानंतरच त्यांनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. स्पर्धा गीताच्या निमित्ताने मंत्रिगटाने पहिला निर्णय दिला. रेहमान म्हणाले, ""माझी सर्व कामे बाजूला ठेवून मी या गाण्यात झोकून दिले आहे. मंत्रिगटाला हे गीत आवडेल की नाही याबाबत मन साशंक होते. पण त्यांना गाणे आवडले आणि त्यांनी लगेच गाण्याला मान्यता दिली.'' त्यांच्या मान्यतेनंतरच रेहमान यांच्या उद्‌घाटन सोहळ्यातील कार्यक्रमास मंजुरी मिळाली.



एकूणच स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांची झळ त्यांच्यापर्यंत येऊन पोचल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, ""प्रसारमाध्यमांनी आता नकारात्मक प्रसिद्धीपेक्षा सकारात्मक गोष्टी समोर आणण्यासाठी पुढे आले पाहिजे. लंडनमध्ये असतानाच मला नकारात्मक प्रसिद्धीची माहिती मिळाली होती. झाले गेले विसरून जा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चला आपण एकत्र काम करुयात.''

मारुतीच्या कार धावणार आता सीएनजीवर

मुंबई - मारुती सुझुकी कंपनीने आपली पाच मॉडेल्स नैसर्गिक वायू (सीएनजी) अंतर्गत रुपांतरित करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आता मारुतीच्या एसएक्‍स- फोर, इको, वॅगनआर, इस्टिलो आणि अल्टो आदी गाड्या सीएनजीवर धावतील. या पाच मॉडेल्सना अत्याधुनिक इंजिन जोडण्यात येणार असून इंटेलिजेंट गॅस पोर्ट इंजेक्‍शन अथवा आय-जीपीआय असे त्याचे नाव असेल. या इंजिनामुळे गाडीची क्षमता वाढून इंधन बचत होण्यासही मदत होईल.




मारुतीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीवरील कारमध्ये सर्वप्रकारची गुणवत्ता आढळून येईल. नेहमीच्या कारनिर्मितीप्रमाणेच याचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे.



त्याच्या किमती पुढीलप्रमाणे - अल्टो एलएक्‍सआय 2.78 लाख रुपये (पेट्रोल) आणि 3.23 लाख रुपये (सीएनजी), इस्टिलो 3.55 लाख रुपये (पेट्रोल) आणि 4.05 लाख रुपये (सीएनजी), वॅगनआर 3.61 (पेट्रोल) लाख रुपये आणि 4.11 लाख रुपये(सीएनजी), इको (एसी आणि पाच आसनी) 3.09 लाख रुपये (पेट्रोल) आणि 3. 64 लाख रुपये (सीएनजी), एपएक्‍स-फोर 6.92 लाख रुपये (पेट्रोल) आणि 7.47 लाख रुपये (सीएनजी).

बदल : काळाची गरज

बदल हा नेहमीच हळुवार होत असतो; परंतु त्याकडे डोळसपणे बघणे आणि त्याप्रमाणे आपल्या वागण्यात बदल करणे म्हणजे बदलत्या जगाशी जुळवून घेणे. बदलाचे प्रयत्न उत्साहाने राबवावेत, जोपर्यंत मूळ उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत प्रयत्न सातत्याने चालू ठेवावेत.




एकदा एक प्रयोग केला गेला. एका पाण्याने भरलेल्या भांड्यात एका बेडकाला सोडण्यात आले. ते भांडे मंद अशा विस्तवावर ठेवले. पाणी हळूहळू तापू लागले; परंतु तो बेडूक ते ऊबदार पाणी शेकत शांतपणे बसून राहिला.

बेडकाला हा उबदारपणा आवडला होता. त्यामुळे बेडूक अगदी खुशीत होता; परंतु जसजसे तापमान वाढू लागले, तसे बेडूक अस्वस्थ होऊ लागले; परंतु तरीही ते पाण्याबाहेर यायचा प्रयत्न करीत नव्हते. एका ठराविक तापमानावर पाणी गरम झाल्यावर बेडूक पाण्यातच राहिला व त्यातच मरण पावला.



बोध : बदल हा नेहमीच हळूवार होत असतो; परंतु त्याकडे डोळसपणे बघणे आणि त्याप्रमाणे आपल्या वागण्यात बदल करणे म्हणजे बदलत्या जगाशी जुळवून घेणे.



बदल कसा स्वीकारावा?

'द आइसबर्ग इज मेल्टिंग' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक जॉन कोटर (जे "चेन मॅनेजमेंट' या संकल्पनेचे गुरू मानले जातात) यांनी बदल कसा घडवावा यासाठी आठ तत्त्वे सांगितली आहेत. ही तत्त्वे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एका सोसायटीत 50 बिऱ्हाडे आहेत व पाणीकपातीची चर्चा सुरू आहे.



महत्त्वाची आठ तत्त्वे

सोबतची आठ तत्त्वे आपण आपल्या दैनंदिन जीवनात, घरी, नोकरीच्या ठिकाणी वापरली असतीलच; पण याचा जाणीवपूर्वक उपयोग केला, तर बदल हा आनंददायी होऊ शकतो.

Ref :eSakal

मानवी व्यक्तिमत्त्वाचे व्यावहारिक पैलू

आपल्याला अनुकूल असणारा परिणाम साधण्यासाठी समोरच्या माणसाचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे गरजेचे असते. व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड पगडा माणसाच्या वागणुकीवर होतो. निरनिराळ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या माणसांचा प्रभाव त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांवर, कळत-नकळत होत असतो. व्यक्तिमत्त्वावर भावनांचा विशिष्ट प्रभाव आढळून येतो. वस्तुतः व्यवहारामध्ये भावनांना किंमत नसते. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनांना बाजूला ठेवणेच इष्ट असते.




"व्यक्तिमत्त्व म्हणजे नक्की काय,' या प्रश्‍नाचे अचूक उत्तर देणे कदाचित अवघड वाटेल, कारण व्यक्तिमत्त्व साकारणारे अनेक गुणधर्म हे व्यक्तीगणिक बदलत जातात. अनेक तत्त्ववेत्त्यांनी "व्यक्तिमत्त्व' या शब्दाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. गॉर्डन ऑलपोर्ट यांनीच "व्यक्तिमत्त्व' या शब्दाच्या पन्नास व्याख्या केलेल्या आहेत. तथापि, या सर्व पुस्तकी व्याख्यांच्या अभ्यासातून फारसा व्यावहारिक अर्थबोध संभवत नाही.



व्यावहारिक पातळीवर "व्यक्तिमत्त्व' या शब्दाचे सोप्या भाषेत वर्णन करायचे झाले, तर ते खालीलप्रकारे करता येईल. "एखादा मनुष्य वरप्रकरणी जसा वाटतो, त्याला त्याचे व्यक्तिमत्त्व समजावे.' याचाच अर्थ एखादा मनुष्य वरकरणी जसा वाटतो, तसाच तो अंतरंगात असेलच असे नाही. बहुतांशी वेळा तो तसा नसतोच. परंतु, अशा बाह्यांगावर भाळणारे आणि विसंबून राहून निर्णय घेणारे बरेच लोक समाजात आढळून येतात.



वागणुकीवर परिणाम

व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड पगडा माणसाच्या वागणुकीवर होतो. निरनिराळ्या संस्थांमध्ये, औद्योगीक, सरकारी, निम-सरकारी, खासगी वगैरे. काम करणाऱ्या माणसांचा प्रभाव त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांवर, कळत-नकळत होत असतो. अशा ठिकाणी "चांगले व्यक्तिमत्त्व' किंवा "वाईट व्यक्तिमत्त्व' तसेच "अनुकूल व्यक्तिमत्त्व' किंवा "प्रतिकूल व्यक्तिमत्त्व' वर्गीकरण करणे, तितकेसे सयुक्तिक वाटत नाही.

काही व्यक्तींमुळे प्रशासनातील अवघड समस्या सहजपणे सोडवता येतात. तसेच काही व्यक्तींच्या अस्तित्वामुळे सर्व माणसांना अनावश्‍यक मानसिक त्रास होतो, काही व्यक्तींमुळे संस्थांमध्ये कलह होतात, असे अनेकदा ऐकण्यात येते. अशा सर्व समस्यांचे मूळ हे विशिष्ट व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वातच आढळून येते. समस्या निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व हे बऱ्याचदा अनाकलनीय किंवा गूढ असते. अशा व्यक्तिमत्त्वांच्या माणसांमुळे चांगले संबंध बिघडतात.



आपल्याला अनुकूल असणारा परिणाम साधण्यासाठी समोरच्या माणसाचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे गरजेचे असते. एखाद्या खटल्यामध्ये कशाप्रकारे बाजू मांडली असता, न्यायाधीश आपल्या बाजूने निकाल देतील, याचा अंदाज वकिलांना असणे गरजेचे असते. कुशल वकील ही बाब लक्षात घेऊन मुत्सद्दीगिरीने आणि धोरणाने वागून खटल्याचा निकाल स्वतःच्या बाजूने फिरवून घेऊ शकतो. या संबंधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आलेला अनुभव विचारात घेणे, गरजेचे वाटते. एका खटल्याकडे अनेक कामगार युनियनचे तसेच उद्योजकांचे लक्ष्य होते. कारण, त्या खटल्यामध्ये कामगारांच्या प्रश्‍नांबाबत अनेक कामगारांचे भवितव्य ठरणार होते. न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत खटल्याची सुनावणी तब्बल नऊ वेळा पुढे ढकलली.



प्रत्येक वेळी ते वेगळ्या पक्षाची बाजू घेत. त्यामुळे सर्व लोक संभ्रमित झाले होते. एखादेवेळी असे वाटायचे, की खटल्याचा निकाल कामगारांच्या बाजूने लागेल, तर दुसऱ्यावेळी असे वाटायचे की खटल्याचा निकाल उद्योजकांच्या बाजूने लागेल. शेवटी दहाव्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी निकाल हा कामगारांच्या बाजूने दिला.निकालानंतर न्यायाधीशांची व वकिलांची मुलाखत घेण्यात आली. न्यायाधीशांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला, "आपल्याला हा निकाल देण्यासाठी सुनावणी नऊ वेळा पुढे का ढकलावी लागली?,' न्यायाधीश उत्तरले, "वस्तुस्थिती काय आहे हे पहिल्याच सुनावणीमध्ये माझ्या लक्षात आले होते. मी फक्त सर्व बाजू चाचपून पाहात होतो.'

पत्रकारांनी वकिलांना प्रश्‍न विचारला, "न्यायाधीश ज्या वेळी सुनावणी पुढे ढकलत होते, तेव्हा आपल्या धोरणांमध्ये काही बदल करावा असे तुम्हाला वाटले का?' वकील उत्तरले, "मी न्यायाधीशांचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे ओळखून आहे. मला माहीत होते की व्यक्तिमत्त्वाचा जो पैलू तो वरवर दाखवत होते, तो खरा नव्हता. त्यामुळे मी माझ्या धोरणावर व पवित्र्यावर ठाम राहिलो.'



संस्थांमध्ये काम करीत असताना सर्व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरेच पैलू समोर येतात, असे नाही. "माणसे जे बोलतात, त्याच्या बरोबर उलटे वागतात,' असे ऋषी प्रभाकर यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे कर्मचारी नक्की काय बोलतात यापेक्षा ते कोणती कृती करतात, हे महत्त्वाचे असते. अशा वागण्याला "संस्थांतर्गत राजकारण' असे म्हणतात.



(या ठिकाणी "राजकारण' या शब्दाचा अर्थ फक्त संस्थांमधील राजकारणांकरिता मर्यादित स्वरूपात वापरण्यात आला आहे.) अशा राजकारणी वर्तणुकीला किंवा राजकारणी डावपेचांना बळी न पडता योग्य ते निर्णय घेणे आणि सयुक्तिक वर्तणूक ठेवणे महत्त्वाचे असते.



निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वाची माणसे ताण-तणावाच्या प्रसंगांना सामोरे जाताना वेगवेगळ्या भावनांचे प्रदर्शन करताना दिसतात. उदा. कार्यालयामध्ये कामाचा कितीही ताण असला तरीही काही माणसे पूर्णतः तणावमुक्त असतात. तसेच, काही लोकांना कोणतेही काम तणाव निर्माण करणारे वाटते. याउलट काही माणसे केवळ तणावाखाली किंवा काही माणसे केवळ तणावविरहित वातावरणातच काम करू शकतात.



एका हॉस्पिटलमध्ये माझ्या पाहण्यात एक प्रसंग आला. एका वृद्ध गृहस्थांचे "ऑपरेशन' सुरू होते. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्यांचे नातेवाईक जमा झाले होते. त्यांच्यामध्ये त्यांची दोन मुले होती.

दोनही मुले (एकाच परिस्थितीमध्ये) वेगवेगळ्या मनःस्थितीत वाटत होती. त्यांचा थोरला मुलगा अशांत आणि अस्वस्थ होता. त्याला वडिलांच्या तब्येतीची काळजी वाटत होती. त्याच्या देहबोलीतून ते स्पष्ट दिसून येत होते. त्याच वेळी त्यांचा दुसरा मुलगा अत्यंत शांत व संयमी दिसत होता. इतर नातेवाइकांशी मृदू आवाजात संभाषण करीत होता. यामधील एक व्यक्तिमत्त्व "आदर्श', असे ठरविणे चुकीचे आहे. हा दोन व्यक्तिमत्त्वांमधील महत्त्वाचा फरक आहे.



व्यक्तिमत्त्व आणि बुद्‌ध्यांक यांचा संबंध असतोच असे नाही. एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले होते, की माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याएवढाच बुद्‌ध्यांक असणारी भारतामध्ये पाच हजार माणसे होती. परंतु, अशा पाच हजार माणसांपैकी केवळ एकच माणूस पंतप्रधान होऊ शकला. याचाच अर्थ, बुद्‌ध्यांक हा व्यक्तिमत्त्वाचा किंवा यशस्वी होण्यातील केवळ एक भाग आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये बुद्धिचातुर्याने व्यक्तिमत्त्वाला अनुकूल मुरड घालून यश मिळवणे आवश्‍यक असते.



भावनांचा प्रभाव

व्यक्तिमत्त्वावर भावनांचा विशिष्ट प्रभाव आढळून येतो. वस्तुतः व्यवहारामध्ये भावनांना किंमत नसते. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनांना बाजूला ठेवणेच इष्ट असते. "क्रिकेटची टीम निवडत असताना पाषाणहृदयी असावे आणि गुणवत्ता या एकाच निकषावर आधारित खेळाडूंची निवड करावी,' असे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सुचवलेले आहे. तथापि, मानसिक भावनांचा अनादर करून किंवा त्यांना पूर्णपणे डावलून केवळ व्यावहारिक पातळीवर निर्णय घेणे कायम शक्‍य नसते किंवा बऱ्याचदा आवश्‍यक नसते. तारतम्याने विचार करून या बाबतीत निर्णय घेणे हितावह ठरते.



बुद्धी-मनाचा संबंध

मन आणि बुद्धी हे परस्परांबरोबर काम करत असतात. या दोघांच्या संवेदनांमध्ये जेव्हा भिन्नता येते किंवा खंड पडतो, तेव्हा माणसाला धक्का बसतो. उदा. रस्त्यावरून फिरत असताना अचानक मोठा आवाज होतो आणि एक अपघात होतो. कुतूहलापोटी गर्दीला मागे सारत आपण आवाजाच्या दिशेने जातो. जवळ पोचल्यावर असे दिसते, की आपण ज्या मित्राशी एका तासापूर्वी दूरध्वनीवर बोललो, तो अपघातात ठार झालेला आहे. अशा प्रसंगी बुद्धीला अपघातात आपला मित्र गेलेला आहे हे पटलेले असते, परंतु मन वस्तुस्थिती मान्य करायला तयार नसते.



व्यक्तिमत्त्व - जडणघडण हा संपूर्णतः वेगळा विषय आहे. व्यावहारिक पातळीवर विचार करता व्यक्तिमत्त्वाचे कोणते पैलू व्यावहारिक यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून विकसित करणे गरजेचे आहे, याचा सखोल विचार केल्यास अनेक समस्या सहजासहजी सुटू शकतात.

Ref : eSakal

Marathi Wallpapers

Get Free Mobile wallpapers On On http://www.myheartbuzz.com/